अहमदनगर: महाराष्ट्रात जागतिक महामारीत राजकारण चांगलेच ढवळून निघाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षात त्याच प्रमाणे महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार यांच्यात चांगलाच संघर्ष झाला आहे. लसीकरण, लसींचे दर, रेमेडीसीवर चा पुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा या विषयांवरून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाल्या. आता मात्र महाविकास आघाडी सरकार मधील घटकपक्षांमधे मोफत लसीकरणावरून संघर्ष बघायला मिळत आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार मधील धुसमुस समोर येत आहे.
राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणाच करून टाकली होती पण, यात श्रेय घेण्यासाठी जी लढाई सुरू आहे, ती योग्य नाही. निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला पाहिजे, असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी महाविकासआघाडी राज्यात मोफत लस देईल आणि याबाबत केबिनमध्ये निर्णय होईल असे बोलून दाखवले, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये वाद पेटला आहे. पत्रकारांशी बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी नवाब मलिक यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
आमची भूमिका स्पष्ट आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितलं आहे की, सर्वसामान्यांना लस मोफत दिली पाहिजे, त्याबद्दल आम्ही आग्रह धरला आहे. यात श्रेयाची लढाई सुरू आहे ती योग्य नाही. मोफत लसीकरणाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला पाहिजे. याबाबत चर्चा सुरू आहे, श्रेयासाठी घोषणा करणे योग्य नाही, असं थोरात यांनी स्पष्ट केले. 1 तारखेपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. आता गर्दी वाढण्याची शक्यता आहे. ह्यात गोंधळ होईल कोरोना प्रसार वाढेल. मी मुख्य सचिवांबरोबर चर्चा केली असून आपलं धोरण ठरवले पाहिजे, केंद्राची जबाबदारी आहे लस उपलब्ध करून देणे. दोन दिवसात धोरण निश्चित केला जाईल. 45 वर लसीकरण देताना देखील गोंधळ झाला होता आता 18 वर्षवरील देताना धोरण ठरवावं लागेल, असंही थोरात म्हणाले.