पिंपरी चिंचवड – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काळ देशभरात भारत बंद पुकारला होता. अनेक राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांना या बंदला पाठिंबा दिला होता. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडत एक अजब दावा केला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे ते मँनेज केलेले आहे.या आंदोलनामध्ये आंदोलक भाडेकरु आहेत, त्यांना रोज ३०० रुपये भाड्याने आणलेले आहे. असा दावा उपमहापौर केशव घोळवे यांनी केला. तसेच या आंदोलनास चीन व पाकीस्तानकडून रसद पुरविली जात आहे काय? अशी शंका व्यक्त करुन शेतकरी आंदोलनाची थट्टा उडविली.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भारत बंदचे जोरदार पडसाद पिंपरी चिंचवड शहर तसेच महापालिकेच्या सभेतही उमटले. विरोधी पक्षनेते राजू मिसाळ हे काळे कपडे, तर इतर विरोधी नगरसेवक दंडाला काळ्या पट्ट्या बांधून मोदी सरकार हाय हाय आणि जय जवान, जय किसान अशा घोषणा देत सभागृहात आले. देशभर बंद असल्याने सभा उद्यापर्यंत स्थगित करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, सत्ताधारी भाजपने ती फेटाळत कामकाज रेटून नेले. त्यातच पमहापौर घोळवे यांच्या वक्तव्याने वाद आणखीनच चिघळला. कामगार नेते असलेल्या उपमहापौर केशव घोळवे यांचे आक्षेपार्ह वक्तव्य हा शेतकरीच नव्हे, तर कामगारांचाही अवमान आहे, असा आरोप मिसाळ यांनी केला.