धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघात अनेक चेहऱ्यांची चाचपणी केल्यानंतर अखेर महायुतीकडून जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध पाटील असा सामना आता धराशिवच्या मैदानात पहायला मिळणार आहे.
विशेष म्हणजे राणाजगजितसिंह पाटील हे भाजप आमदार असताना देखील सक्षम चेहरा म्हणून अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश देत उमेदवारी देण्यात आली. या पक्षप्रवेशावेळी धाराशिव मतदार संघातील महायुतीचे पाचही आमदार एकत्र उपस्थित होते. हेच समीकरण पाटील यांना दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी गेमचेंजर ठरू शकते.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांमध्ये पाटील विरुद्ध निंबाळकर ही पारंपरिक लढाई झालेली आहे. 2019 साली ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेनेकडून लढताना राष्ट्रवादी काँग्रेसचेकडून उमेदवार असलेले राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. परंतु गेल्या काही वर्षामध्ये राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीचे परिणाम या मतदारसंघात देखील दिसून आले. सध्या धाराशिव लोकसभा मतदार संघात महायुतीचे पाच आमदार असून यामध्ये भाजपचे तीन तर शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत.
अर्चना पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावेळी भूम परंडाचे आमदार आणि मंत्री तानाजी सावंत, औसाचे अभिमन्यू पवार, उमरग्याचे ज्ञानराज चौगुले, बार्शीचे राजेंद्र राऊत व तुळजापूरचे आमदार आणि पाटील यांचे पती राणाजगजितसिंह पाटील हे उपस्थित होते. मतदार संघातील महायुतीची ताकद अर्चना पाटील यांच्यासाठी मोठी जमेची बाजू मानली जात आहे.
ओमराजे निंबाळकर हे त्यांच्या भाषण कौशल्यामुळे प्रसिद्ध असले तरी मतदार संघात ठोस विकासकामे न केल्याचा मुद्दा त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. उलटपक्षी गेल्या दोन वर्षात राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शेकडो कोटींची विकासकामे केली जात आहेत.
पाटील यांनी धाराशिवमध्ये रेल्वेचे जाळे निर्माण करण्यात देखील मोठे यश मिळवले आहे. तर पिकविमा व नुकसान भरपाईसाठी त्यांनी प्रयत्न केल्याने हजारो शेतकऱ्यांना लाभ मिळू शकला. महायुती सरकार आल्यापासून लोकसभेत समाविष्ट विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेला विकास आणि विरोधी उमेदवाराकडून गेल्या पाच वर्षांमध्ये नागरिकांची झालेली निराशा हे अर्चना पाटील यांच्यासाठी फायद्याचे गणित ठरू शकते.