सातारा : राज्यात कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरत आहे. अशावेळी राज्यातील लॉकडाऊन अजून १५ दिवस वाढवण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे आणि सातारा जिल्ह्याचा दौरा केला आहे. यावेळी नादुरुस्त व्हेंटिलेटरच्या मुद्द्यावरुन अजित पवार चांगलेच संतापले.
पीएम केअरकडून आलेले अनेक व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. पण असे व्हेंटिलेटर दुरुस्त करुन घ्यावे लागत आहेत. अशा काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज्यात आता रेमडेसिव्हीरचा तुटवडा राहिला नाही. पण म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन कमी पडत आहे. तसंच रुग्णालयातील ऑक्सिजन, फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटच्या सूचना दिल्याची माहितीही त्यांनी दिली. आपण फक्त परिस्थितीचा आढावा घेतला नाही तर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. जिथे कर्मचारी कमी आहेत, तिथे कर्मचारी दिले. ७ रुग्णवाहिका उद्या साताऱ्यासाठी येतील. लसीकरणासाठी दादागिरीच्या तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत पोलिसांना कुणाचाही मुलाहिजा न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशा शब्दात अजित पवार यांनी दादागिरी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.