राज्यसरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकात लक्षणं नसलेल्या व्यापाऱ्यांना कोरोना चाचणीची गरज नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे नागपुरातील 20 हजार व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील प्रत्येक दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. चाचणी न केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा मुंढे यांनी दिला होता. त्यामुळे नागपुरातील व्यापारी वर्गामध्ये नाराजीचा सूर होता.
अनेक व्यापाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयाचा जाहीरपणे विरोधही केला होता. मात्र, आता राज्य सरकारच्या परिपत्रकाने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे . महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दररोज वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी चाचणी करणं जरुरीचं आहे. मात्र, जे रुग्णांच्या संपर्कात गेले आहेत त्यांचीच चाचणी करणं जास्त गरजेचं आहे. कारण प्रत्येकाची चाचणी करणं अद्याप शक्य नाही. कारण चाचण्यांवरील ताण वाढतो. याशिवाय शासनाचा आर्थिकभारही वाढतो. त्यामुळे राज्य सरकारकडून नेमक्या चाचण्या कुणाच्या कराव्यात याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
एखादा कैदी दाखल झाल्यानंतर त्याला एक आठवडा क्वारंटाईन ठेवण्यात यावे. त्यानंतर अँटीजन चाचणी करावी. चाचणीच्या निष्कर्षानुसार आयसोलेशन, कोव्हिड रुग्णालय दाखल करण्याबाबतचे निर्णय घेण्यात यावे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकाच रुग्णांच्या दोन-तीन चाचण्या करण्यात येतात. त्यामुळे चाचण्यांवरील ताण वाढतो, त्याचबरोबर शासनाचा आर्थिकभारही वाढतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक व्यक्तींची प्रोटोकॉलनुसार चाचणी करावी, अधिकच्या चाचण्या करु नयेत. प्रवास करणाऱ्या व्यक्ती, जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्ती, व्यापारी अशांची त्यांना कोरानाची लक्षणे नसल्यास चाचणी करण्यात येवू नये.