मुंबईत नेहरू सेंटरमध्ये झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालीन काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. विधानसभेचे अध्यक्ष पद कुणाकडे? हा यातील शाब्दिक चकमकीचा मुद्दा होता, असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात इतका रंगतदार आणि अखेरच्या चेंडूपर्यंत खेळला जाणारा सामना कधीच झाला नव्हता. नेहरू सेंटरमधील ठिणगी असे एखादे सरकार येईल असा विश्वास जसा काँग्रेसला नव्हता तसा शिवसेनेच्या नवनियुक्त आमदारांनाही नव्हता. शरद पवार आणि माझ्यात 35 दिवस सुरू असलेल्या गाठीभेटी हा निव्वळ टाईमपास आहे असा अपप्रचार सुरू झाला. 17 नोव्हेंबरला सकाळी पत्रकारांनी मला विचारले, ”तुमच्याकडे किती आमदारांचे पाठबळ आहे?” तेव्हा ”आमचा आकडा 170 आहे” असे मी सांगितले. त्या 170 आकडय़ाची खिल्ली उडवण्यात आली. तोपर्यंत सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता, पण अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते, असेही राऊत म्हणाले.