मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळून घेण्याचा सल्ला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून दिला होता. या पत्रातून सेनेने भाजपशी पुन्हा युती करावी, असंही त्यांनी एकप्रकारे सांगितलं. यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चोला उधान आले आहे. मात्र शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत राऊत यांनी ‘ताजा कलम’ लिहून या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देऊन सरनाईकांसाठी काही सवाल उपस्थित केले आहेत, ज्याचा विचार सरनाईकांना येत्या काळात करावा लागणार आहे.
‘मोदींशी वाकडं नव्हतंच, जुळवून घेण्याचा प्रश्न येतो कुठे…?’
पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे स्थान संसदीय लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च आहे. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांशी जुळवून घेतलेच आहे. मुळात ‘ वाकडे-तिकडे ‘ काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कोठे?, असा सवाल करत तरीही ‘विनाकारण त्रास’ असा काही नाहक प्रकार सुरू असेल तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र जसेच्या तसे त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल, असं आजच्या अग्रलेखात संजय राऊत म्हणाले आहेत.
सरनाईकांनी पत्र का लिहिलं, राऊतांनी ‘कारण’ सांगितलं!
सरनाईकांच्या पत्राचा ताजा कलम इतकाच आहे की, महाराष्ट्रात भाजपने सत्ता गमावली या चिडीतून महाविकास आघाडीच्या आमदारांना विनाकारण त्रास दिला जात आहे. आपल्याला आणि आपल्या कुटुंबीयांना नाहक त्रास दिला जात आहे. एका केसमध्ये जामीन मिळाला की तत्काळ दुसऱ्या केसमध्ये जाणीवपूर्वक गुंतवले जात आहे, असेही सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या संपूर्ण पत्रातील ‘विनाकारण त्रास’ हाच शब्द व त्यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
विनाकारण त्रास म्हणजे काय, तर तो हाच…!
ऐन निवडणूक मोसमात तृणमूलच्या अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा फास आवळला गेला होता. एवढेच नव्हे तर, विधानसभा निवडणूक जिंकूनही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री व इतर दोघांना ‘नारद’ घोटाळ्यात बेकायदेशीर अटक केली गेली. तेव्हा ममता बॅनर्जी यांनी स्वतः सीबीआय कार्यालयात घुसून सगळय़ांचीच दाणादाण उडवली. त्या घोटाळ्याचे इतर दोन प्रमुख नेते (त्यातले एक सुखेन्दू अधिकारी) भाजपमध्ये गेल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे सीबीआयने टाळले. ‘विनाकारण त्रास’ जो काही आहे तो हाच, असंही राऊत अग्रलेखात म्हटलं आहे.