मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे अडचणीत आलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, आज अखेर नैतिक जबाबदारी स्वीकरून, स्वतःहून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या गृहमंत्री पदाची सूत्रे मुख्यमंत्र्यांकडे आहेत.
आज मुंबई हायकोर्टाने या प्रकरणावरून, अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना, आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला. यासाठी सीबीआयला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, सीबीआयला या मुदतीमध्येच, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याचे, त्यांच्या राजीनाम्यामध्ये लिहिले आहे.
दरम्यान, आता यावरुवून भाजपच्या नेत्यांनी सरकरवर टीका करायला सुरुवात केली आहे. या प्रसंगावरून भाजपच्या नेत्या आणि माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी, ट्वीट करून ठाकरे सरकारला टोला लगावत, ‘देर आये पर दुरुस्त नहीं आये ‘, या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे ‘दुरुस्त आये ‘ म्हणणे शक्य तरी होईल, असे म्हटले आहे.
दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेन्द्र फणवीस यांनीही ‘परमबीर सिंग यांनी जे काही आरोप केले होते. त्याबद्दल मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे. त्यानंतर हे अपेक्षितच होतं की राजीनामा आवश्यक होता. हा राजीनामा उशीरा झाला आहे, तात्काळ राजीनामा घ्यायला हवा होता, पण आज देशमुख यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे, पण ही नैतिकता पहिल्या दिवशीच आठवायला हवी होती, असा टोला लगावला आहे.
गृह मंत्री यांचा राजीनामा' देर आये पर दुरुस्त नहीं आये ', या सरकारला आणखी अनेक राजीनामे घ्यावे लागतील म्हणजे 'दुरुस्त आये ' म्हणणे शक्य तरी होईल..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 5, 2021
दरम्यान, आता या पदाची धुरा पेलवेल, असा कोणता नेता राष्ट्रवादीच्या गोटात आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. गेल्या महिन्यापासूनच गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. यानंतर आता पुढचे गृहमंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे.