दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील घटनेने देश हादरला असून आता त्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत. काल कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा हाथरसमधील पिडीत कुटुंबातील लोकांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर अडवून उत्तर प्रदेश पोलीसांनी धक्काबुक्की केली आहे. आता यावर देशातील अनेक नेते टिका करत आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार व त्यानंतर तिचा करण्यात आलेला अमानुष खुनामुळं सध्या देशात संतापाची लाट आहे.
विरोधकांनी या घटनेवरून उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारला धारेवर धरलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे काल पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पायी निघाले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावेळी त्यांना धक्काबुक्की झाली. त्यांची कॉलर पकडण्यात आली व पोलिसांनी त्यांना ढकलून दिल्याचं सांगतिलं जात आहे. त्यावरून आता राजकारण तापलं आहे. काँग्रेसनं यावर तीव्र प्रतिक्रिया देत आंदोलनाची हाक दिली आहे. तर, भाजपच्या विरोधकांनीही टीकेची झोड उठवली आहे.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
‘उत्तर प्रदेशचे पोलीस राहुल गांधी यांच्याशी ज्या पद्धतीनं वागले, ते चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला व राजकारणाला शोभणारं नाही. हा प्रकार म्हणजे देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा सामूहिक बलात्कार आहे,’ असा संताप राऊत यांनी व्यक्त केला आहे. ‘एका मुलीवर बलात्कार झाला. तिचा निर्घृण खून झाला. याविरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवायच नाही? ही कुठली लोकशाही आहे?,’ अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
‘राहुल गांधी हे खासदार आहेत. त्यासोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे नातू व राजीव गांधी यांचे सुपुत्र आहेत. या दोन्ही नेत्यांनी देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर ज्यांना पडला आहे त्यांना इतिहास माफ करणार नाही,’ असंही राऊत म्हणाले.
Read Also :
योगी सरकार खूप काही लपवत आहे : खा. सुप्रिया सुळे https://t.co/ZWZ0BVQEJ7
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 2, 2020