जळगाव: “ओबीसी आरक्षण प्रश्न हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा आहे. संपूर्ण देशातील ओबीसी वर्गाचे नुकसान झाले आहे. भाजपच्या चोराच्या उलट्या बोंबा आहेत,” अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली. तसेच या प्रश्नावर राज्यसरकारने न्यायलयात धाव घेतली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी नाना पटोले हे (बुधवारी) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील फैजपूर येथे नवीन कृषी कायद्यांची होळी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील इत्यादी उपस्थित होती.
ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यातील ५ जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समितीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्याविरोधात आता भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोलेंनी भाजपवर जोरदार घणाघात केला.
हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा प्रश्न
ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप सरकार जबाबदार आहे. २०१७ मध्ये हा विषय आल्यावर हेच राज्यातील ओरडणारे विरोधी पक्षातील लोक सत्तेत होते, त्यावेळी त्यांनी लक्ष दिले नाही. केंद्र सरकार ओबीसीची आकडेवारी देत नाही. त्यामुळे न्यायालयाने राज्यातील राजकीय आरक्षण रद्द केले आहे. मात्र आता हा केवळ राज्याचा नव्हे तर देशाचा प्रश्न आहे, असे नाना पटोले म्हणाले. तसेच आता या आरक्षणासाठी राज्य सरकार न्यायालयात गेले आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही लवकरच चर्चा करणार आहोत, अशी माहितीही नाना पटोले यांनी दिली.