मुंबई : महाराष्ट्रामध्ये काल एका दिवसात करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून, महाराष्ट्रात काल दिवसभरात ६३ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात ३९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ४५ हजार ३३५ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या आकडेवारीमुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.
तसेच राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय केले जात आहेत. मात्र तरी देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. परिणामी इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.
एकीकडे अशी विदारक परिस्थिती असताना, दुसरीकडे विरोधकांनी राज्य सरकारच्या गलथान कारभारावर, लॉकडाऊनच्या निर्णयावर, तसेच सरकारच्या कार्यक्षमतेवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आज पत्रकारांशी बोलताना विरोधकांना राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे. संजय राऊत यांनी आज करोना लसीचा दुसरा डोस मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात घेतला.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले पाहिजे. लसीकरणावर राजकारण करू नका. राज्यात करोनाग्रस्तांच्या चिता जळत आहेत. त्या बघा, आतातरी शहाणे व्हा, चितेत राजकारण जाळून टाका. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करत आहेत. त्यांना साथ द्या. कोरोनाची लाट मोठी आहे. सहकार्य करा. केवळ टीका करण्यात वेळ घालवू नका, असे आवाहन विरोधकांना केले आहे. तसेच लस सुरक्षित आहे. सुरक्षित राहण्यासाठी सर्वांनी लस घ्या, असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, राज्यतल्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.