मुंबई : अनिल देशमुख यांनी काल राज्याच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर, आज गृहमंत्री पदाची सूत्रे माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हाती घेतली.
यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी आज राज्याच्या गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी सध्याचा काळ कठीण असून प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप न करता मला देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली. यासोबतच, त्यांनी राजकीय निष्ठा बाळगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबाबतच्या प्रश्नावरही सूचक विधान केले आहे.
तसेच, मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने गृहमंत्र्यांना प्रश्न विचारला असता, ‘मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी, कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार सीबीआय असो किंवा एनआयए असो सर्व यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केलं जाईल, असंही सांगितलं.
दरम्यान, गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विट करत, नव्या जबाबदारीसाठी दिलीप वळसे पाटलांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘”आज माझे स्नेही दिलीपराव वळसे पाटीलजी यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा!”
तसेच, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील वळसे पाटलांना, त्यांच्यासोबतचा युवक कारकिर्दीतील एक फोटो समाज माध्यमांवर पाठवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोखाली त्यांनी, “माझे जुने मित्र ना. दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. कडक शिस्त… कायद्याची सखोल जाण असणारे ते प्रशासक आहेत. ज्या खात्यात काम केले तिथे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता या नवीन जबाबदारीसाठीही त्यांना मनापासून शुभेच्छा!” असे जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
Today my dear friend Diliprao Walse Patil Ji (@Dwalsepatil), took the charge as the Home Minister of Maharashtra. Congratulations and best wishes to him on this new responsibility!
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 6, 2021