मुंबई : टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट यंत्रणेत फेरफार करुन फायदा मिळवल्याचा ठपका असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी रविवारी चौकशीसाठी मुंबई पोलिसांसमोर हजर झाले. सध्या मुंबई पोलीस आयुक्तलयातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात त्यांची चौकशी सुरु आहे. त्यामुळे या चौकशीत आता कोणत्या नवीन गोष्टी समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी रिपब्लिक टीव्हीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत चौकशीसाठी नकार दिला होता. परंतु, आज विकास खानचंदानी चौकशीसाठी हजर झाले आहेत. मुंबई पोलिसांनी एआरजी मीडिया प्रायव्हेट लिमीटेडशी संबंधित सहा जणांना टीआरपी घोटाळाप्रकरणी आज चौकशीसाठी पाचारण केले होते.
रिपब्लिक वृत्तवाहिनी एआरजी मीडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून हाताळली जाते. त्यामुळे आजच्या चौकशी सत्रात पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती हाती लागण्याची शक्यता आहे. सध्या विकास खानचंदानी यांची चौकशी सुरु असून इतर लोकांची चौकशी दुपारच्या सुमारास पार पडेल.
रिपब्लिक चॅनलकडून कारवाई न करण्याची विनंती
टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या कारवाईविरोधात रिपब्लिक चॅनलने यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पुढील आठवड्यात रिपब्लिकच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंती रिपब्लिक चॅनेलकडून मुंबई पोलिसांना करण्यात आली होती.
त्यामुळे रिपब्लिक चॅनेलचे सीएफओ शिवा सुब्रम्हणयम हे शनिवारी चौकशीसाठी उपस्थित राहिले नव्हते. रिपब्लिक चॅनेलने घटनेच्या कलम 32 नुसार याचिका केली आहे. त्याचा क्रमांक 7848/2020 असा आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. यामुळे आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याने आपण तपासाची घाई करू नये, अस शिवा सुब्रम्हणयम यांनी मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.
काय आहे टीआरपी घोटाळा?
बीएआरसी BARC या संस्थेकडून टीआरपी मोजला जातो. यासाठी देशभरात जवळपास 30 हजार बॅरोमीटर्स लावण्यात आले आहेत. यापैकी दोन हजार बॅरोमीटर्स हे एकट्या मुंबईत आहेत. हे बॅरोमीटर्स कुठे लावलेत, याची माहिती गोपनीय असायची. हंसा या कंपनीला या बॅरोमीटर्सची देखभाल करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून टीआरपीमध्ये फेरफार करण्याचे रॅकेट चालवण्यात येत होते.
खाद्या चॅनेलचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना दिवसभर आपल्या टीव्हीवर संबंधित चॅनेल सुरु ठेवण्यास सांगितले जाई. यासाठी लोकांना पैसे दिले जात असत. संबंधित चॅनेल सतत सुरु राहिल्याने त्याचा टीआरपी वाढण्यास मदत होत असे.
Read Also :
हे काम थांबवा, पण सुरुवात भाजपपासून करायला हवी, संजय राऊतांचा अमित शहांना टोलाhttps://t.co/x7cSkmzQ0q
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 11, 2020