मुंबई : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 23 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असल्याचे पालकमंत्री उदय सामंत आज यांनी सांगितले. मालवण तालुक्यातील तळगाव तलाठी सजाच्या उद्घाटन आज पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी पालकमंत्री ते बोलत होते.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल पाठक, निवासी तहसीलदार आनंद मालनकर, सरपंच अनघा वेंगुर्लेकर, उपसरपंच अनंत चव्हाण, जि.प. सदस्य नगेन्द्र परब, संग्राम प्रभुगावकर, संजय पडते, मुंबईचे माजी महापौर दत्ताजी दळवी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झाराप येथे वैद्यकिय महाविद्यालयासाठी शिक्षण विभागाची जागा देण्यास 48 तासात मान्यता दिल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करता यावे यासाठी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येणार आहे. सर्वांशी संवाद साधता यावा व नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावता यावेत यासाठी जनता दरबार सुरु करण्यात आला आहे. हे जनता दरबार तालुकास्तरावरही घेण्यात येणार आहेत.