मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांचा आत्मा आणि मन हिंदुत्वानं ओतप्रोत भरलेलं आहे. त्यामुळं त्यांना हिंदुत्वाचे धडे देण्याची गरज नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या पत्राला प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे सरकार लोकनियुक्त आहे आणि राज्यपाल हे घटनात्मक पद आहे.
त्यामुळं सरकार घटनेनुसार चालत आहे की नाही तेवढंच पाहा, असा सल्लाही राऊतांनी राज्यपालांना दिलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या राजभवनाला भारतीय घटनेला धरुनच उत्तर दिल्याचा दावा राऊतांनी केला आहे.
देशात काही राज्यांनी मंदिरं उघडली, तिथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम काम करत असल्याचं राऊत म्हणाले. त्याचबरोबर हे सरकार पाच वर्षे चालेल, त्यांना आनंद घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा, अशी खोचक टिप्पणीही राऊतांनी केली.
राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.
या पत्रव्यवहारावरुन आता राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनीही राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकेवर बोट ठेवलं. राज्यपाल महोदयांनी कोरोनाबाबत राज्य सरकारच्या कामगिरीला शाबासकी द्यायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचा अदब राखला नाही- आंबेडकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातून त्यांचा अदब पाळला गेला नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. त्यावर आंबेडकरांना असं वाटत असेल तर त्यांच्याशी चर्चा करु, असंही राऊतांनी म्हटलंय.
चंद्रकांत पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरुन भाजपनं जोरदार टीका केलीय. ‘तुम्ही राज्यात सर्व काही सुरु केलं. दारुची दुकानंही सुरु केली. पण मंदिरं सुरु केली नाहीत. अशावेळी तुम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही तर कुणाला आहे?’ असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काय म्हणणं आहे? त्यांना नेमकं काय करायचं आहे? कोरोना हा मंदिरात दबा भरून बसला आहे का? मंदिरात गेलेल्या माणसावर कोरोना हल्ला करतो का?, विमानातून, एसटी आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही का?, असा खडा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. मंदिरं न उघडणं हा मुख्यमंत्र्यांचा हेकेखोरपणा असल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे.
Read Also :
ओबीसी आरक्षणाबाबत विरोधकांकडून गैरसमज; राष्ट्रवादी पाठबळ देणार नाही : जयंत पाटील https://t.co/t6ltti1tCn @Jayant_R_Patil @ChhaganCBhujbal
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 13, 2020