सोलापूर : उजनी धरणातून 5 टीएमसी इंदापूरला देण्यात आल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून होत आहे. यावरून राजकारण तापले असून, राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांच्यावर देखील आरोप केले जात आहेत. यातच आता भाजप नेते सुभाष देशमुख यांनी यावरून थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उजनीचे पाणी इंदापूरला पळवण्याचा प्रयत्न केला तर जे पक्ष, नेते येतील त्यांच्यासोबत किंवा नागरिकांना घेऊन आपण स्वतः जनआंदोलन उभारू आणि आगामी अधिवेशानात याबाबत आवाज उठवू, असा इशारा भाजप नेते सुभाष देशमुख यांनी दिला आहे.
दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व आहे. त्यांनी उजनी धरणाच्या पाण्याबाबत सोलापुरात एक आणि इंदापुरात एक व्यक्तव्य करू नये. हे त्यांना शोभत नाही. पालकमंत्र्यांनी सत्तेचा दुरूपयोग करू नये, अशी बोचरी टीका देखील देशमुख यांनी भरणे यांच्यावर केली आहे.
सुभाष देशमुख म्हणाले की, सोलापूरचे पाणी नेणार नाही, असा शब्द पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. त्यांनी तो शब्द पाळावा. उजनीच्या पाण्यासाठी पुणे आणि सोलापूर अशी लढाई करण्याचा प्रश्नच नाही. ज्याच्या हक्काचे पाणी आहे त्यालाच ते मिळाले पाहिजे. सत्तेचा कोणीही दुरूपयोग करू नये. सत्ता जात येत असते.
दरम्यान, उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या पाणीसाठ्यातील एक थेंबही इंदापूरला गेला तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी दत्तात्रय भरणे यांनी केले होते.