मुंबई : महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडींवरून, राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ‘करोना आला आणि सोबत ठाकरे सरकारसाठी अनेक संकटं घेऊन आला’, असंच म्हणण्याची वेळा आली आहे, असे दिसून येत आहे. दिशा सालियन प्रकरणापासून सुरु झालेली ठाकरे सरकारवरची संकटं संपायची नावं घेत नाहीयेत. त्यात मंत्रीमंडळातील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता तिसरा मंत्रीदेखील राजीनामा देईल, अशा चर्चांना सगळीकडून खतपाणी मिळत आहे.
दरम्यान, याच सगळ्या घटनाप्रसंगांच्या अनुषंगाने आज मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत, ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “हे वाझे महाविकास आघाडी सरकारला किती प्रिय आहेत, ते विधानसभा अधिवेशनावेळी दिसलं. वाझे प्रकरणात विधानसभा ९ वेळा स्थगित करण्यात आली. असं सांगत त्यांनी आघाडीवर निशाणा साधला.
तसंच त्यांनी यावेळी, “शरद पवारांनीही, अनिल परब गृहखात्यात लुडबूड करत असल्यामुळे नाराजी दर्शवली होती, अशा अनेक बातम्या माध्यमांनीच प्रसिद्ध केल्या होत्या. गृहमंत्र्यांनी घोषणा करण्याऐवजी अनिल परब यांनीच वाझेंचा चार्ज काढून घेत असल्याचं सभागृहात घोषित केलं होतं”, असं सांगत, अनिल परबांचा त्रागा आहे. चौकशीला सामोरे जाणार असेल तर शपथा कसल्या घेताय? असा टोला लगावला.
“तिसऱ्या मंत्र्याचाही राजनामा येणार हे तुम्हाला कसे माहित होते?” या हसन मुश्रीफ यांच्या सवालावर चंद्रकांत पाटील यांनी, “येत्या १५ दिवसांत आणखी २-३ मंत्र्याचे राजीनामा होणार हा सामान्यांचा अंदाज आहे. असे सांगितले. तसंच, निष्पक्षपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला आणि सुप्रीम कोर्टात चौकशी होऊ नये म्हणून गेले. सर्वसामान्य माणूस सरकारच्या या प्रकाराला वैतागला आहे. राठोड झाले, देशमुख झाले आणि परबांचे नाव आले आहे. ही संघटीत गुन्हेगारी आहे. या संघटीत गुन्ह्याचे पुरावे कागदपत्रात आले तर या सर्वांवर मोक्का लावावा, असे विधानदेखील त्यांनी यावेळी केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी, “मी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाही. परंतु महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू नये यासाठी काय राहिलंय. कोरोनात भ्रष्टाचार करणार, हप्ते वसुली करणार आणि केंद्राकडे बोट दाखवणार. केंद्राने काय काय दिलं हे उघड आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी आणखी काय काय लागतं? याबाबत तज्ज्ञांनी सांगावं असा खोचक टोला ठाकरे सरकारला लावला आहे. त्यामुळे राज्यात घडत असणाऱ्या घटनाप्रसंगावरून, विरोधी पक्ष आता आपली आक्रमक भूमिका अधिक तीव्रपणे घेताना दिसून येत आहे.