मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’मुळे अडचणीत आलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, आज अखेर नैतिक जबाबदारी स्वीकरून, स्वतःहून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. त्यामुळे राज्याची सत्ता हातात घेऊन ठाकरे सरकारला अडीच वर्षे होत नाहीत, तोवर त्यांच्या मंत्रिमंडळातल्या दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.
आज ‘लेटरबॉम्ब’ प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात झाली. यामध्ये मुंबई हायकोर्टाने परमबीर सिंग यांची याचिका फेटाळून लावली, तर अॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना, आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे. यासाठी सीबीआयला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, सीबीआयला या मुदतीमध्येच, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे.
दरम्यान, यावरून आता विरोधी पक्ष, सरकारवर तोंडसुख घेताना दिसत आहे. यातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर मोठे विधान केले आहे. रामदास आठवले यांनी सांगितले की, आता असे वाटत नाहीये की; महाविकास आघाडी सरकार, राज्यात आपला कार्यकाळ पूर्ण करू शकेल. महाराष्ट्रात एकीकडे करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्यातच या घटनाप्रसंगामुळे सरकार फार दिवस तग धरेल, असे वाटत नाही असे विधान त्यांनी केले आहे.
तसेच, गृहमंत्री अनिल देशमुखांना आधीच राजीनामा देण्य़ाची गरज होती. मात्र त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला. आता पवारांनीच देशमुखांना राजीनामा देण्यास परवानगी दिली ही चांगली बाब आहे, असे आठवले म्हणाले.