मुंबई : महाराष्ट्रातील करोना बाधित रूग्णांची वाढती संख्या, प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी, परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा उडालेला गोंधळ, इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची जाणवत असलेली कमतरता यांवरून महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्ष भाजपसह अन्य पक्षांनीही टीकेची झोड उठवली आहे.
दुसरीकडे करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रासह देशामध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात देखील करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस नवे उच्चांक गाठत आहे. देशातल्या अनेक राज्यांमध्ये करोना परिस्थिती बिकट असून, रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, ‘मला जे चित्र दिसतंय त्यानुसार महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातच लॉकडाऊन लावले गेले तर आश्चर्य वाटायला नको,’ असे विधान केले आहे.
तसेच त्यांनी, उत्तर प्रदेशमध्ये हरिद्वारला होणाऱ्या कुंभमेळ्याचे आणि प.बंगालमध्ये होणाऱ्या प्रचारसभांचे दाखले देत दावा केला आहे की, ‘इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात या गोष्टींवर नियंत्रण आहे. महाराष्ट्रामध्ये बाहेरील राज्यांमधून लोक येतात. तिथे काहीच नियंत्रण नाही आहे. त्यामुळेच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.’
दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, तसेच टास्क फोर्स सोबतच्या बैठकीत, राज्यातील हाताबाहेर गेलेली परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यात १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णयावर विचार पक्का करण्यात आला आहे.
त्यामुळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनीच असे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे.