मुंबई : राज्यात करोना बाधित रुग्णांची आकडेवारी वाढतच चालली असताना, दुसरीकडे करोना प्रतिबंधात्मक लसींच्या पुरवठ्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातल्या भाजप सरकारमध्ये जोरदार राजकारण सुरु असल्याचे चित्र गेले काही दिवस पाहायला मिळत आहे.
या वादात आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील उडी घेतली असून, लसीकरणावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात चाललेल्या खडाजंगीवरून भाजपवर निशाणा साधत त्यांनी, केंद्रीय सत्तेतील जे आपले मराठी मंत्री आहेत, तेच तिथे बसून महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. जगाच्या इतिहासात असं मी कधी पाहिलं नव्हतं. आपल्याच राज्याची बदनामी दिल्लीच्या सरकारमध्ये बसून करायची, हे कोणतं राजकारण सुरू आहे?” असा सवाल विचारला आहे.
यावेळी संजय राऊत यांनी, ‘भाजपलाही याच राज्यातील जनतेनं निवडून दिलंय. भाजपच्या 105 आमदारांना महाराष्ट्रातील जनतेनंच निवडून दिलंय. मग, या 105 आमदारांना मतदान दिलेले लोकं कोण आहेत, निदान तुम्हाला निवडून दिलेल्या लोकांसाठी तरी लस घेऊन या, ज्यांनी तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलंय, ते कौतुकास्पद आहे,’ असं म्हणत डिवचलं.
तसेच त्यांनी करोना संबंधित कोणत्याही विषयात राजकारण आणू नका असे सांगताना, ‘राजकीय मतभेद असू शकतात, पण आजचं संकट भयंकर आहे. करोना विरोधातली लढाई, ही आमची व्यक्तीगत नसून, आम्ही केंद्राच्या नेतृत्वात लढाई लढत आहोत. महाराष्ट्रातील जनता ही मोदींची जनता नाही का? असा परखड सवालही राऊत यांनी केला.