मुंबई : राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात करोना बाधित रुग्णांची नोंद होत असल्यामुळे, राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. राज्यात ५ एप्रिपासून नवीन करोना प्रतिबंधक नियमावली लागू केली गेली आहे. परंतु, या नियमावलीमुळे सामान्य जनतेचे जीवनचक्र पुन्हा मंदावले असून, नवीन नियमांना घेऊन, नागरिकांमधून देखील संमिश्र भावना उमटत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे करोना प्रतिबंधात्मक लसींना घेऊन, राज्य आणि केंद्रात जुंपलेली, गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळत आहे. केंद्रातील नेत्यांकडून, तसेच राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून, राज्य सरकारच्या गलथान कारभारावर सडकून टीका होत आहे, तर राज्यात सत्तेत असलेले महाविकास आघाडी सरकार हे या बाबतीत केंद्राकडे बोट दाखवून, ‘महाराष्ट्राला लसींच्या पुरवठ्याच्या बाबतीत केंद्राकडून अशी वागणूक का?असा सवाल करत आहे.
दरम्यान, यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, एका वृत्तवाहिनीशी बोलतना, ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. मंत्र्यांना सध्या मुख्यमंत्र्यांनी एकच काम दिलंय. केंद्रावर आरोप करा आणि आपलं पाप झाका, अशी टीका विखे-पाटील यांनी केली आहे. राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा खोचक टोला देखील राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला लगावला आहे.
यावेळी त्यांनी, केंद्रावर बोट दाखवण्यापेक्षा रेमडेसिवीर, ऑक्सिजन उपलब्ध करा. प्रत्येक मंत्र्याला आपापल्या मतदारसंघात २०० बेडचं कोविड रुग्णालय उभारायला सांगा, असा सल्ला आघाडी सरकारला दिला. तसेच, इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्याला व्हॅक्सिन मिळाले, पण त्याचे नियोजन राज्य सरकारने केले नाही. हा हलगर्जीपणाचा कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच राज्य सरकारचा चाललेला हा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली आहे.