मुंबई : देश महामारीच्या धगधगत्या झळा सोसत आहे. दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच देशभरात असणाऱ्या रेमेडीसीवर आणि इतर औषधांच्या, लसींच्या आणि ऑक्सिजनच्या अभावी महामारीने बाधित रुग्णांचे हाल होताना आणि अनेकांचे दुर्दैवी मृत्य होतानाचे चित्र माध्यमांवरून सातत्याने दाखवले जात आहे. तसेच, देशाच्या आरोग्य यंत्रणेवर यामुळे प्रचंड ताण पडत आहे.
मात्र तरीही नवीन संसद भवनाचं काम केंद्राकडून सुरू ठेवण्यात आलं आहे. त्यावरून केंद्र सरकारवर प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. यातच, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांनी देखील नव्या संसद भवनाच्या कामावर टीका केली होती. दरम्यान, त्यांच्या या टीकेला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
यावर आता रोहित पवारांनी परत ट्विट केले असून, संसद निश्चित महत्वाची आहे, पण आज लोकांचा जीव महत्त्वाचा असल्याने सगळे स्रोत आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडं वळवणं गरजेचं असतांना करोनाच्या संकटातही कामगारांना ओढून आणून संसदेचं काम पूर्ण करण्याचा अट्टहास कशासाठी? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
संसद निश्चित महत्वाची आहे पण आज लोकांचा जीव महत्त्वाचा असल्याने सगळे स्रोत आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडं वळवणं गरजेचं असतांना कोरोनाच्या संकटातही कामगारांना ओढून आणून संसदेचं काम पूर्ण करण्याचा अट्टहास कशासाठी?
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 29, 2021
तसेच, “युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच, अशी खोचक टीका देखील त्यांनी भाजपवर केली आहे.