मुंबई : राज्यात करोनाच्या वेगाने होणाऱ्या फैलावामुळे, रुग्णसंख्या अतिशय वेगाने वाढत असून, त्यामानाने आरोग्य यंत्रणा आणि सोयी सुविधा कमी पडत आहेत. परिणामी राज्यात करोना बाधित होणाऱ्या आणि करोनाने दुर्दैवी मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढत आहे.
दरम्यान, करोना महामारीमुळे निर्माण झालेल्या या ‘भूतो न भविष्यती’ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत, राज्यातल्या सर्व तेरा विद्यापीठांच्या, सर्व उर्वरित परीक्षा ऑनलाईन होणार असल्याची माहिती दिली आहे. कुलगुरूंबरोबरच्या बैठकीत यावर निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच करोनाच्या लसीकरणासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठांमार्फत लस देता यावी, यासाठी देखील सक्षम यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले.
तसेच, ऑनलाईन परीक्षेसाठी यंत्रणा उभारणार असून, एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीदेखील सामंत यांनी दिली. यावेळी त्यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊन त्यांना प्रमाणपत्रं मिळणं गरजेचं आहे, असं सांगत त्यांच्या भवितव्यातील शिक्षणात अडचणी येणार नाही, त्याला प्राधान्य असेल असं म्हटलं आहे.
यावेळी, राज्यातील ३७ लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याची घोषणा त्यांनी केली. १८ ते २५ वयोगटातील या सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी विद्यापीठांच्या मार्फत सक्षम यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न करणार असून, तसं झाल्यास लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळणं शक्य होईल, मात्र विद्यार्थ्यांना लस मोफत देण्याबाबतचा निर्णय मात्र मुख्यमंत्रीच घेऊ शकतील असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषि विद्यापीठाच्या सर्व कुलगुरूंसोबत महाविद्यालयीन व विद्यापीठीय परिक्षांसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. १८+ वय असणाऱ्या राज्यातील सुमारे ३६,००,६७० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. pic.twitter.com/HV2nFpuT2F
— Uday Samant (@samant_uday) April 22, 2021