राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे माझ्या संपर्कात नाहीत. मात्र, इतर नेते संपर्कात आहेत. एकनाथ खडसेंचा ज्याप्रमाणे प्रवेश झाला तसे इतर नेते योग्य वेळ आल्यावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
यापुढे बोलताना पाटील म्हणाले की, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नेमणुकीमध्ये उशीर झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. विधानपरिषदेच्या जांगावरुन कोणतेही मतभेद नाहीत. कोरोनामुळे निर्णय घेण्यात उशीर झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. यावर बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, प्रत्येक राजकीय पक्षाला अपेक्षा बाळगणे गरजेचे असते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशामध्ये काही वावगं वाटत नाही. प्रत्येकाला ज्यांचा त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. असही त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच जयंत पाटील म्हणाले.” पंकजा मुंडे यांनी नेहमीच शरद पवार यांच्याबद्दल आदर केला आहे. ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांचे वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याशी बोलून प्रश्न मार्गी लावले आहेत. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नामध्ये कधीही राजकारण दिसून आले नाही.”