सातारा : ओबीसी आणि मराठा समाजात काही नेते मंडळी तेढ निर्माण होतील असे वक्तव्य करत आहेत. यामध्ये मंत्री विजय वडेट्टीवार हेच पुढाकार घेत आहेत. वडेट्टीवारांसारखी मंडळी राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचे काम करत असल्याचा आरोप शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र ओबीसी कोट्यातून नको अशी भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली होती. यावरून आता मेटे यांनी वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणाबाबत योग्य दिशा ठरविण्यासाठी 3 ऑक्टोबरला पुण्यात मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी या बैठकीचे निमंत्रण छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. ते साताऱ्यात बोलत होते.
विनायक मेटे म्हणाले की, आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी राज्य सरकारची अवस्था आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर गृहखात्यापाठोपाठ आरोग्य खात्यानेही भरती काढली आहे. ही दोन्ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत आणि तेच भरती काढत आहेत.
शरद पवार राज्यातील छोटे-छोटे प्रश्न सोडवतात मग हा आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाहीत, असा सवाल देखील मेटे यांनी केला.