मुंबई : मराठा आरक्षण प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून, याबाबत पुढील महिन्यात सुनावणी सुरू होणार आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने अनेक तरूणांचे भविष्य संकटात आहे. त्यामुळे राज्य सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सरकारमध्ये एकी नसल्यामुळे ‘मराठा समाजावर अशी परिस्थिती असल्याचा’ आरोप राज्य सरकारवर केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मेटे म्हणाले की, मराठा आरक्षणाबातत सर्वोच्च न्यायालयात 25 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. मराठा समाजात या सगळ्याबाबत संशयाचं वातावरण आहे. जर काही कमी जास्त झालं तर इतिहास माफ करणार नाही. सरकारमध्ये एकी नसल्यामुळे मराठा समाजावर अशी परिस्थिती आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली.
आज (20 डिसेंबर) मराठा संघटनांची मुंबईत बैठक होणार असून, सर्व मराठा संघटनांनी हजर राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केली.
मेटे म्हणाले की, समाजाच्या हितासाठी सर्व मराठा संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. राज्य सरकार त्यांच्या अपयशाचे खापर मराठा संघटनांवर फोडू पाहत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.