उस्मानाबाद – नागपूर, पुणे आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. नागपूर आणि पुणे हा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातही राष्ट्रवादी आणि काँग्रेस उमेदवारानं अभूतपूर्व विजय संपादित केला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघहा तर फडणवीसांचा बालेकिल्ल्याचा मात्र या ठिकाणी देखील भाजपचा पराभव झाल्याने शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
“भारतीय जनता पक्षाला मतदारांनी 100 टक्के धुडकावून लावले आहे. विदर्भ, नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बडबड बंद करावी; महविकास आघाडी सरकारवर आमचा विश्वास आहे. हा सल्ला विदर्भातील जनतेने दिला आहे,” अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
तसेच भाजपने विरोधी पक्षात काम करायचे आहे, हा संदेश महाराष्ट्रातील जनतेने दिला. या संदेशाचे भाजपने तंतोतंत पालन करावे,” असा सल्लाही यावेळी खासदार राऊत यांनी भाजपला दिला
नागपूर मतदारसंघात मागील 55 वर्षांपासून भाजपचे प्राबल्य होते. यावेळी मात्र, ही जागा महाविकास आघाडीने खिशात घातली. या ठिकाणी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला. तर भाजपचे उमेदावार संदीप जोशी यांना पराभव पत्करावा लागला. असे विनायक राऊत म्हणाले.