उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावातील शेतकरी दिलीप ढवळे यांनी फसवणूक झाल्याने 12 एप्रिल 2019 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर हे आरोपी आहेत. आता ढवळे यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.
अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीची तत्परतेने दखल घेत ज्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली, अगदी तसेच आपले दिवंगत पती दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्या शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यासह इतर आरोपींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नी वंदना ढवळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
दिलीप ढवळे या शेतकऱ्याची फसवणूक झाल्याने 12 एप्रिल 2019 रोजी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. कारखाना सुरु करण्यासाठी 2010 रोजी कर्ज घेतले होते. मात्र कर्ज परत फेडू न शकल्यामुळे बँकेने त्यांची जमीन लिलावासाठी काढली. त्यामुळे तणावाखाली येऊन त्यांनी आत्महत्या केली. नंतर त्यांचा पुतण्या राज ढवळे यांनी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याची तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तब्बल 5 महिने तपास केल्यानंतर ओम राजेनिंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
वंदना ढवळे म्हणाल्या की, अन्वय नाईक यांना न्याय, तर आम्ही काय घोडे मारले? येत्या दोन दिवसांत आपण मुंबई येथे जाऊन उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आणि खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्यामुळे आपल्या कुटुंबावर ओढावलेल्या संकटाची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत दस्तूरखुद्द उध्दव ठाकरे यांनी जाहीर सभेत ढवळे कुटुंबीयांना वार्यावर सोडणार नाही. त्यांना नक्की न्याय मिळेल, असे वचन दिले होते, याची आठवण देखील त्यांनी करून दिली.