पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या चर्चा, गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्र्रात सुरु आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी,दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत, ‘राज्यातील आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु, त्याला यश येणार नाही. हे सरकार स्थिर आहे आणि राज्यात ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल.’ असे म्हटले होते. परंतु, सत्तेतील घटक पक्षांच्या नेत्यांकडूनही सातत्याने, ‘राज्यातले सरकार स्थिर आहे’, असे बोलले जात असल्याने, राज्यातले सरकार लवकरच पडणार असल्याच्या चर्चांचे पेव फुटले आहे.
अशातच, थोडक्यात सत्तेपासून दुरावलेल्या भाजपाला ही संधी आहे. भाजप परत शिवसेनेसोबत किंवा राष्ट्रवादी सोबत येऊन राज्यात सरकार स्थापन करू शकते, अशा आणि याप्रकारच्या चर्चांना देखील तोंड फुटले आहे. मात्र याबाबतच्या सर्व चर्चांना आणि शक्यतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याने विराम दिला आहे.
आज भाजपचा ४१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपच्या कार्यालयात ध्वजवंदन केले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, पक्षाच्या आगामी काळातील वाटचालीबाबत मोठे सूचक विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘राज्यामधील राजकीय वाटचालीबाबत आम्ही धोरण निश्चित केले आहे. आता आम्हाला राज्यात कुणाच्याही कुबड्या नको आहेत. आम्ही यापुढे स्वबळावर निवडणुका लढवून २०२४ मध्ये सरकार स्थापन करू’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
तसेच, ‘२०२४ मध्ये दोन कोटी मतांचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे.’असा विश्वास देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या काही घटनांमुळे राज्यातील सत्ताधारी असलेले महाविकास आघाडीचे सरकार कमालीचे अडचणीत आले आहेत. त्यातच काल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला, यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी, पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळातील तिसरा राजीनामा येईल, असे भाकित केले आहे. त्यामुळे आता संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर आता कुणाला राजीनामा द्यावा लागू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.