पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात चांगलाच तापला असून, याबाबत वेगवेगळी मते समोर येत आहेत. यावर भाष्य करताना आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मराठा समाजाला त्यांचे आरक्षण मिळालंच पाहिजे. पण ओबीसींच्या आरक्षाला धक्का न लागता, असे मत मांडले आहे.
महात्मा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुण्याच समता भूमी येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आयोजित महात्मा फुले समता पुरस्कार सोहळ्यात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, मंत्रालयात झारीतले शुक्राचार्य खूप आहेत. त्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. राज्यात 54 टक्के ओबीसी समाज आहे. त्यांचं आरक्षण जैसे थे राहिले पाहिजे.
काही लोक म्हणतात मराठा समाजाला ओबीसींमध्ये समाविष्ट करा. वेगवेगळ्या मागण्या पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत संघर्ष निर्माण होऊ शकतो. तसे वातावरण आहे. आपल्या आरक्षणावर, हक्कांवर गदा येत असेल तर त्यासाठी लढायलाच हवे. महात्मा फुलेंनी आपल्याला लढायला शिकवले, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार असो वा फडणवीस सरकार आम्ही मराठा आरक्षणाला कधी विरोध केला नाही. मात्र मराठा समाजातील काही नेते म्हणताहेत की मराठयांना ओबीसींमधून आरक्षण द्यावे, त्यासाठी ते न्यायालयात देखील गेले आहेत. अशावेळी ओबीसी समाजाला जागृत करणे आमचे काम आहे. ते आम्ही करत आहोत, असे मत छगन भुजबळ यांनी मांडले.