मुंबई – ‘आदर पुनावाला यांना कोणी कोणी फोन केले याची माहिती आमच्याकडे आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर ज्यांनी त्यांना फोन केला त्यांची खैर नाही’ असा दावा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला.
आदर पुनवाला यांनी आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली. आता या प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप फेऱ्या सुरू आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी याबाबत आपली भूमिका मांडली.
‘आदर पुनावाला यांना सुरक्षा का मागावीशी वाटली? त्यांचा इशारा स्थानिक पार्टीकडे का? आदर पुनवाला यांना कोणी कोणी फोन केले याची माहिती आमच्याकडे आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर ज्यांनी त्यांना फोन केला त्यांची काही खैर नाही’ असा इशारा शेलार यांनी दिला.
पश्चिम बंगाल निवडणूक चर्चा अजून काही दिवस चालेल. आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. पण ममताजींना पराभूत करू शकलो नाही हे सत्य. पण यशाचं मोजमाप करायचं तर भाजप आहे. कम्युनिस्ट आणि काँग्रेस रसातळाला गेलं. भाजप 3 वरून आताची एवढी संख्या तरी गाठली. छुपे आडवे आणि डावे हात कोणाचे होते ?ते पाहावे लागेल. काँग्रेसला भुईसपाट करण्याचं काम त्या अदृष्य हाताने केलं का?’ असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.
‘पंढरपूर निकाल भाजपच्या बाजूने लागला आहे. पण इथं आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचे पाहायचं वाकून अशी स्थिती झाली. पंढरपूर निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असं नवाब मलिक बोलणार का?’, असा टोलाही शेलार यांनी राऊत यांना लगावला.