सासवड : यंदाची लोकसभा निवडणूक वैयक्तिक नाही तर देशाच्या विकासाची आहे. सुनेत्रा ताईंना मत म्हणजे विकासाला मत. घडाळ्याला मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेल मत आहे. अन् आता अजित आणि विजय एकत्र असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीला दोन लाखा पेक्षा जास्त मताधिक्य मिळेल, असा आशावाद व्यक्त करत “विकासाला देऊ गती आणि जिंकू आपली बारामती” असा नारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सासवडमध्ये दिला. सासवड येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व शिवसेना नेते विजय बापू शिवतारे उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, एकदा शब्द दिल्यानंतर शब्द फिरवण्याचे काम आपल्याकडे नसते. विजय बापू बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे. आपले सरकार बाळासाहेबांच्या विचाराचे, गोरगरिबांचे सरकार आहे. विकासाची गंगा या राज्यात आम्ही आणली. कोविडच्या नावाखाली सर्वकाही बंद होते, आपले सरकार आल्यानंतर सण – उत्सव साजरे झाले, आनंदी वातावरण तयार झाले आणि सरकारच्या कामाने कोविड देखील पळून गेला. कोविड आणि लॉक डाउन हा काही लोकांचा आवडीचा विषय होता, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
हे काम करणारे सरकार आहे. अजित पवारांविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आजीतदादा थेट काम करतात गोलगोल फिरवत नाहीत, यामुळेच सात वेळा लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. आम्ही फिल्डवर फिरून काम करणारी माणसे आहोत मंत्री, मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्त्या सारखे काम आम्ही करतो. एसी ऑफिसमध्ये बसून फक्त आदेश देत नाही. किंवा फेसाबूक लाईव्ह करत नाही. हे 24 तास काम करणारे सरकार आहे, दादा आले आता राज ठाकरे यांनीही मोदीजी वर विश्वास दाखवत विकासाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
कार्यकर्ता जपायचा असतो. शिवतारे सर्वसामान्यांसाठी लढणार नेता आहे. पण जेव्हा त्यांनी महायुतीच्या विरोधातील भूमिका घेतली, तेव्हा त्यांच्याशी आम्ही संवाद साधला कारण एक एक कार्यकर्ता जपायचा असतो, तो घालवायचा नसतो. कारण प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा असतो, असे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.