मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांचा उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. गेले सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांची रुग्णसंख्या ५० ते ५५ हजारांवर जात आहे.
दुसरीकडे करोना लसीच्या पुरवठ्यावरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. काल राज्यात करोना प्रतीबधांत्मक लसींचा तुटवडा निर्माण होऊन, अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली. यावरून केंद्र सरकारवर राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी नाराजीचा सूर आवळलेला आहे, तर केंद्राकडून देखील राज्य सरकारवर, या आरोपांची गंभीर दखल घेत आरोप करण्यात आले.
त्यामुळे करोना लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये, जे पक्ष राजकारण करतात, त्यांना समज देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती.
यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आम्ही राजकारण बंद करतो; पण तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, आम्ही सहकार्य करू; पण त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या, अशी अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर ठेवली आहे.
आज राज्यातल्या करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला अजित पवार, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, सीताराम कुंटे हजर होते.
तसचं यावेळी फडणवीसांनी राज्यात संपूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. राज्यातील सर्व स्तरांतील आणि घटकांतील नागरिकांचा विचार करून, निर्णय घेण्यात यावा असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच राज्याने नागरिकांना मदत केली पाहिजे असंदेखील त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेत, सध्या कोरोनाची साखळी तोडणं गरजेचं आहे आणि लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कडक लॉकडाऊनची गरज आहे नाहीतर परिस्थिती गंभीर होईल, अशी भूमिका मांडली आहे.