मुंबई : केंद्र सरकारने गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरला लागू असणारे कलम 370 हटवल्यानंतर आता भारतातील इतर नागरिक देखील या केंद्रशासित प्रदेशामध्ये जमीन खरेदी करू शकतात, असे आदेश जारी केले आहेत. याच पार्श्वभूमी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून सरकारवर निशाणा साधला आहे. 370 कलमाचा निचरा करूनही काश्मीरचा प्रश्न संपला नाही. काश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले. पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे?, असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
रोखठोक सदरात संजय राऊत म्हणाले की, काश्मीरची समस्या कायमचीच संपायला हवी. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न मार्गी लागला. तसा कश्मीरचा प्रश्नही संपावा. काश्मीरच्या भूमीवर जितका रक्तपात झाला तेवढा आतापर्यंत भारताने लढलेल्या चार युद्धांतही झाला नसेल. मोदी आणि शाह यांनी कलम ३७० उडवून लावले, ३५ अ कलमही संपवलं. पण अजूनही काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत झालेली नाही. उलट तिथल्या लोकांवर, राजकीय हालचालींवर कडक निर्बंध आले. आजही काश्मीरमध्ये लष्कराच्या बंदुकांमुळेच शांतता आहे.
बुबा मुफ्ती आणि त्यांचा पक्ष सरळ आझाद काश्मीरच्या बाजूने आहे. जोपर्यंत पुन्हा 370 कलम काश्मीरात लावले जात नाही तोपर्यंत काश्मीरात तिरंगा फडकवू दिला जाणार नाही, अशी बेताल भाषा करणाऱ्या मेहबुबा मुफ्तीला अटक करून दिल्लीतील तिहार किंवा महाराष्ट्रातील येरवडा तुरुंगात ठेवायला हवे. किंबहुना त्यांची रवानगी अंदमानच्या कारागृहात करायला हवी एवढा त्यांचा अपराध भयंकर आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी तर भारताच्या विरोधात चीनची मदत घ्यायची भाषा केली. हा अतिरेक आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे.