नवी दिल्ली : बुधवारी देशात ३ लाखांहून अधिक करोना बाधित रुग्णानची नोंद झाली, जी आतापर्यंतची विक्रमी नोंद आहे. त्यामुळे देशात अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णसंख्येयमुळे, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन, तसेच करोना महामारीशी संबंधित इतर यंत्रणा आणि संबंधित लोक यांच्यावर प्रचंड प्रमाणात ताण आला आहे.
देशात एकीकडे अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे मात्र चार राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांच्या प्रचारसभांमुळे आणि त्यांना जमणाऱ्या गर्दीमुळे, त्या-त्या राज्यांमध्ये करोनाची परिस्थिती अजून बिकट होत चालली आहे. समाज माध्यमांवर यावरून, भाजप सरकारवर प्रचंड प्रमाणात टीका होत असून, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, एका चॅनेलच्या डिबेट शोवेळी एका रितू रावत या भाजपच्या महिला प्रवक्त्यांनी, स्वत:च्या पक्षालाच घरचा आहेर दिला. ‘सुरक्षित अंतर ठेवा, घरात राहा, असं तुम्ही सांगत होता, मग निवडणुका का घेतल्या? तुम्हीच हे पाळलं नाही. गंगास्नान का करायला दिलं? असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगल्याच भडकल्याचं दिसून आलं.
तसेच, ऑक्सिजन नसल्याने अनेकांचे जीव जात आहेत. या पृथ्वीवर माणसं शिल्लक नसली, तर निवडणुकीचा काय फायदा? सरकार येईल-जाईल, निवडणुका होतील, पण लोकं मरत आहेत, औषधांच्या किंमती वाढत आहेत. मला भाजप प्रवक्ते पदावरून काढलं तरी चालेल, पण मला याचा त्रास होतोय.’ अशी मनातली भावना देखील त्यांनी बोलून दाखवली.