करमाळा: सध्या उजनीच्या पाणीप्रश्नावरून सोलापूर आणि इंदापूर तालुक्यात मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करत उजनीचे पाणी इंदापूरला वळविण्याचा घाट घातलेला आहे. उजनीच्या पाण्याचे संपूर्ण वाटप झालेले असताना सांडपाण्याच्या नावाखाली पाणी पळविण्याच्या विरोधात तीव्र लढा उभारणार आहे असे प्रतिपादन करमाळा तालुका भाजप चे सरचिटणीस अमरजित साळुंके यांनी केले आहे. आता उजनीचे पाणी आणखीच पेटणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सरचिटणीस साळुंके यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले आहे की अगोदर उजनी धरणात चांगले पाणी आणि मगच त्या पाण्याची उचल घ्या. सांडपाण्याच्या नावाखाली संपूर्ण सोलापूर जिल्हयाला गोल करण्याचा डाव नेतेमंडळींकडून आखण्यात आलेला आहे. सत्तेच्या मुजोरीपुढे एकही लोकप्रतिनिधी येण्यास तयार नाहीये. सोलापूर जिल्हयातील एकही लोकप्रतिनिधी भरनेंच्या विरोधात बोलत नाहीये. सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ही अत्यंत खेदाची बाब आहे असे देखील ते यावेळी म्हटले आहेत.
जर पालकमंत्री भरणे यांना पुण्याचे असणारे सांडपाणी इंदापूर तालुक्यालालाच न्यायचे असेल तर ते पुण्यातूनच कालव्याद्वारे आणून इंदापूर मधून तालुक्यात वाटप करावे. ते अस्वच्छ असणारे सांडपाणी उजनीत तरी कशासाठी सोडता असा प्रतिप्रश्न देखील साळुके यांनी केला आहे. उजनी धरणात साठलेला गाळ पहिले काढावा आणि नंतर पाणी साठा वाढवावा. उजनी धरणात इतर नद्यांचे पाणी आणावं यादृष्टीने कोणीही सत्ताधारी नेते प्रयत्न करताना दिसत नाहीत, ही शोकांतिका आहे. “धरण उशाला अन कोरड घशाला” अशी अवस्था आता करमाळा तालुक्यातील धरणग्रस्त आणि शेतकरी बांधवांची झालेली आहे.
उजनी धरणावर सोलापूर शहरासह बार्शी, सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माढा, करमाळा, कुर्डुवाडीसह जिल्ह्यातील मोठ्या शहरांसह पुणे जिल्ह्यामधील दौंड, बारामती, इंदापूर, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगाेंेदा या शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तसेच ७१ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवर ४१६ गावे अवलंबून आहेत. धरणाची पाणीपातळी ४८७.६५ मीटरपेक्षा खाली गेल्यास या योजना अडचणीत येऊ शकतील. सध्या धरणकाठच्या परिसरात शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा हाेत आहे. त्यामुळे पाणी उपशावर नियंत्रण असले तरी शेतकरी त्याविषय नाराज आहेत. भारनियमन कमी केल्यास पाण्याचा उपसा आणखी वाढणार आहे. शेतीसाठी उपसा सुरू रािहल्यास पाणी पुरवठा बंद होईल