कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजप, तृणमूल काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. ममता बॅनर्जींचा विजयीरथ रोखण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांपासून भाजपचे आमदार देखील निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले यशवंत सिन्हा यांनी ‘बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शहा राजीनामा देणार का?’, असा सवाल केला आहे.
Will PM and HM resign if they lose the Bengal elections? Given the stakes they have themselves raised in these elections this is the least they shd do if they have any self-respect left. But I know I am expecting too much from these people without dignity.
— Yashwant Sinha (@YashwantSinha) April 12, 2021
‘बंगालच्या निवडणुका हरल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपल्या पदाचा राजीनामा देणार का?’ असा प्रश्न विचारतानाच ‘या निवडणुकीत ते स्वतः ज्याप्रकारे प्रचारात उतरलेत…त्यानंतरही जर पराभव झाला तर स्वाभिमान राखून त्यांनी किमान राजीनामा द्यायला हवा…पण प्रतिष्ठा नसलेल्या लोकांकडून मी जरा जास्तच अपेक्षा ठेवतोय हे मला माहीत आहे’, असा टोला देखील यशवंत सिन्हा यांनी लगावला आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जींच्या गडात विजय मिळविण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. यातच आता निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करत त्यांच्यावर 24 तासांची प्रचारबंदी घातली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले आहे.