अमरावती – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिवसा येथे आंदोलन करत यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी केली. मात्र चंद्रकांत पाटील यांचं आंदोलन केविलवाणं असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली. त्यावर भाजपला माझ्याकडे राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा, नंतरच मला राजीनामा मागा, असा पलटवार महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
माझ्यावर लावलेले गुन्हे हे राजकीय आकसापोटी आहेत. मात्र कलम 420, 307, 302 अंतर्गत गुन्हे असलेले भाजपचे नेते मोकळे फिरत आहेत. त्यामुळे आधी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागावा, नंतरच माझा राजीनामा घ्यावा. भाजपला माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही, असा पलटवार ठाकूर यांनी केला.
यशोमती ठाकूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढल्यास काँग्रेस सरकार आपला पाठिंबा काढून घेईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत असल्यानेच ते यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेत नाहीत, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला. यशोमती ठाकूर जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत भाजप आंदोलन करत राहील, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. येत्या काळात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.