मुंबई – राज्यात महाविकासआघाडी सरकारमध्ये सतत कुरघोडी सुरु असतात. महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेस ला डावललं जात आहे अशा अनेक चर्चा समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाची नाराजी समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण असल्याची चर्चा होती. पण आता महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांच्या ट्विटमुळे काँग्रेसची नाराजी उघड झाली आहे.
“आघाडीमधील नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आल्या आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन करावं”, असं ट्विट करत यशोमती ठाकूर यांनी सूचक इशारा दिला आहे.
काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे.@INCIndia @INCMaharashtra @RahulGandhi @kcvenugopalmp @HKPatil1953 @bb_thorat
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 5, 2020