मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील शाळा प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आलेला आहे. शाळा प्रत्यक्षात सुरू झालेल्या नसल्या तरी ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील ऑनलाईन होत आहे. मात्र दहावी-बारावीच्या महत्त्वाच्या परीक्षा कधी व कोणत्या पद्धतीने होणार याबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न आहेत. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डच्या यंदा एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये घेण्यासंदर्भात विचार सुरु असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.
परीक्षांबाबत शिक्षण तज्ञांचे मार्गदर्शन घेत आहोत. तसेच राज्य शिक्षण मंडळाशी देखील याबाबत चर्चा सुरु असल्याचे त्या म्हणाल्या.
तसेच दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर प्रस्ताव ठेवला होता. परंतु, दहावी, बारावीचे विषय खूप असतात. तसेच वेगवेगळ्या भाषाही असतात. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे कठीण असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाल्या.