मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी ठाकरे सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व रुग्णांना लस देण्यास परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील 36 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील 18 पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दिनांक 1 मे पासून लस दिली जाणार आहे. यात विद्यापीठ व महाविद्यालयातील सुमारे 36 लाख 870 विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 18 वर्षावरील विद्यार्थ्यांना लस मिळणे आवश्यक असून त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय परीक्षांबाबत सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, राज्यातील 13 विद्यापीठातील उर्वरित सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येतील अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. या विद्यापीठांमध्ये कृषी विद्यापीठाचा समावेश नाही.