मुंबई : राज्यात ५ एप्रिलपासून राज्य सरकारने करोना साथीला आळा घालण्यासाठी, तसेच बाधित रुग्णांच्या संख्येत घट करण्यासाठी, नवीन नियमावली जाहीर केली असून, राज्य सरकारच्या या कडक निर्बंध असलेल्या नियमावलीच्या अंमलबजावणीवेळी मोठा गोंधळ उडालेला दिसून येत आहे.
नवीन नियमावलीत राज्य सरकारने, शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण लॉकडाऊन असे सांगत, इतर दिवशी दुकाने सुरु असतील असे सांगितले होते, परंतु जिल्हा प्रशासनाने मात्र त्यांच्या आदेशात 30 एप्रिलपर्यंत सरसकट सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, व्यावसायिक, व्यापारी आणि दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर उभे राहून या आदेशाला आपला विरोध दर्शवला आहे. यावेळी त्यांनी विकेंड लॉकडाऊनला आमचा विरोध नाही, पण 30 एप्रिलपर्यंत दुकानेच उघडायची नाहीत, याला आमचा विरोध असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यासंदर्भात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा द्यावी. तसेच, सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र’ अशा आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहून नवीन नियमावली जारी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी केवळ दोनच दिवसांचा लॉकडाऊन असल्याचे समजून आम्ही सहमती दर्शवली होती. असे सांगून नकळतपणे या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.. pic.twitter.com/1U9LuvklhW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 6, 2021
दरम्यान, राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या दोन वेगवेगळ्या परिपत्रकांमुळे गोंधळ निर्माण झाला असल्याचे दिसते आहे. राज्य सरकारने किराणा औषधे वगैरे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद म्हटले आहे. त्यावेळी, केवळ 2 दिवसांचा विकेंड लॉकडाऊन असेल, असा समज सर्वांचाच झाला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने आदेश काढल्यानंतर 30 एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.