मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांच्यासह चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. या सरकारला कसलीही लाज वाटत नाही. एवढं सगळं होतंय, पण यांना फक्त राजकारण करता येतंय, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी मुंबईतील वीजेच्या प्रश्नावरुन सरकारवर निशाणा साधला. भाजपच्या महिला मोर्चाचा धसका घेतल्यानेच मुंबईची लाईट घालवल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला.
प्रसाद लाड म्हणाले, “कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत. महिलांवरील अत्याचार शिगेला पोहोचलेले आहेत. असं असताना निष्क्रीय बसून राहणाऱ्या सरकारच्या निषेधात शिवाजी पार्कवर जनतेचा प्रचंड आक्रोश दिसून आला. सरकार विरोधात भाजपने काढलेल्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.” यावेळी लाड यांनी सरकारने भाजप महिला मोर्चाचा धसका घेतला म्हणूनच मुंबईची लाईट घालवल्याचाही आरोप केला.
चित्रा वाघ यांनी देखील हे सरकार लाज आणणारं बेशरम सरकार असल्याची घणाघाती टीका केली.
आशिष शेलार म्हणाले, ठाकरे सरकार हे फक्त झोपलेलं सरकार आहे. त्यांना आता जागं करण्यासाठी हा मोर्चा काढला आहे. याची दखल घेतली नाही, तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हाच आक्रोश रस्त्यावर उतरेल. दोन महिन्याच्या आत महिला अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केलाच पाहिजे अशा केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स आहेत. मात्र, महाराष्ट्रात तसं होताना दिसत नाही.
Read Also :
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी: आमदार संदीप क्षीरसागर https://t.co/j8lyipSC3m
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 12, 2020