राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. याच पर्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करत आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून आहेत त्यामुळे अशी टीका विरोधकांकडून होत होती. त्यामुळे विरोधकांकडून होत असलेली टीका लक्षात घेता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडायला पाहिजे अशा शब्दांत त्यांचे कान टोचले होते
त्यानंतर आता मुख्यमंत्री जागे झाले आहेत. आज त्यांनी पुण्याच्या दौरा करत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही उपाययोजनाही जाहीर केल्या.
मात्र आता मुंबईच्या बाहेर पडलेले मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबणार नसून, राज्याच्या काही भागांमध्ये जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ते लवकरच मराठवाड्यात जाऊन तेथील कोरोना परिस्थिती जाणून घेणार आहेत.
उद्धव ठाकरे ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. औरंगाबादेतूनच ते मराठवाड्यातील नांदेड, लातूर, बीड, परभणी, जालना, उस्मानाबाद, हिंगोली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे.