मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोमवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे व खासदार डॉ. भागवत कराड यांनी राळेगणसिद्धी येथे हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली.
हजारे यांनी उपोषणाचा निर्णय घेऊ नये, अशी विनंती त्यांनी या वेळी केली. ४५ वर्षे मंदिरात राहणाऱ्या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल तर सामान्य जनतेचे काय, असा सवाल करतानाच वचन न पाळणाऱ्या सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा राहिली नाही, असा इशारा हजारे यांनी या वेळी दिला.
हजारे यांनी केलेल्या मागण्या शेतकरी हिताच्या असून त्यासंबंधी चर्चेतून योग्य मार्ग काढण्यात येईल. त्यांचे वय पाहता त्यांनी आता उपोषणाचा मार्ग अवलंबू नये असा आग्रह भाजप नेत्यांनी हजारे यांना केला. हजारे यांनी गेल्या आठवडय़ात केंद्रीय कृषी मंत्र्यांना, शेतक ऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता.
या वेळी हजारे यांना सुधारित कृषी कायद्याची मराठी आवृत्ती भाजप नेत्यांनी दिली. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून लवकरच देशातील शेतक ऱ्यांची प्रगती झाल्याचे पाहायला मिळेल असे भाजप नेत्यांनी सांगीतले.
या सर्व प्रश्नांवर उच्चाधिकार समिती नियुक्त करून योग्य निर्णय घेण्यासाठी सरकारला काही वेळ द्यावा, अशी विनंती भाजप नेत्यांनी हजारे यांना केली. तसेच हजारे यांच्या प्रकृतीची काळजी वाटत असल्याने त्यांनी या वयात उपोषण करू नये असा आग्रहही त्यांनी धरला. केंद्रीय पातळीवर चर्चा करून हजारे यांच्या मागण्यांसंबंधी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे या वेळी खासदार डॉ. कराड यांनी सांगितले.
Read Also :
पत्नीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला म्हणून भाजपा खासदाराने दिली घटस्फोटाची धमकी
अयोध्या विवाद : अशी असणार अयोध्येची पाच एकर जागेवरील मशीद; डिझाईन झालं प्रसिद्ध
आमदार फोडण्याची ताकद अजित पवार यांच्यात नाही, चंद्रकांत पाटलांची टीका
‘पाकिस्तानाहून अधिक मुस्लीम भारतात, अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा’