मुंबई : भाजपचे आमदार फोडण्याएवढी ताकद अजित पवार यांच्यात नाही. ती असती तर ८० तासांचे सरकार त्यांना टिकवता आले असते, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले.
पाटील यांनी बुधवारी सायंकाळी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, तीन पक्ष एकत्र आल्यावर त्यांची ताकद जास्तच होणार. ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडी विजयाचा प्रयत्न करील, मात्र आम्हीसुद्धा ताकदीने निवडणूक लढवणार आहोत.
शिवसेना सोबत नसल्याने आमचे नुकसान आहे. पण सत्तेत असलेल्या शिवसेनेचेही नुकसान होत असून शिवसेना संपत चाललीय, अशी टीकाही त्यांनी केली. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवाराला १ लाख २० हजार मते मिळाली. याचा अर्थ तीनही राजकीय पक्षांना प्रत्येकी ४० हजार मते मिळाली. भाजपला एकटय़ाला ७३ हजार मते मिळाली. मात्र निवडणुकीत हे गणित चालत नाही, असे ते म्हणाले.
मर्यादेचे उल्लंघन..
राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व नेते एकमेकांना ट्रोल करताना मर्यादा पाळत नाहीत. मला ‘चंपा’ म्हटले गेले. मात्र आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘उठा’ किंवा ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना ‘शपा’ असे कधी म्हणणार नाही. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
Read Also :
“शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा…,” संजय राऊतांना खरमरीत पत्र
‘लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तिच महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची’