पंढरपूर: मागील काही काळात पंढरपूर-विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीला आमदार भारत भालके यांचे सुपुत्र महाविकास आघाडीकडून उभे होते. त्यांचा या निवडणुकीत समाधान अवताडे यांनी पराभव केला. भगिरथ भालके हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष देखील आहेत. हा कारखाना अनेक दिवसांपासून आपल्या गलथान कारभारामुळे चर्चेत आला आहे. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची बिले अदा करण्यात आलेली नाहीत. वारंवार आंदोलन करूनही परिस्थिती सुधारलेली नाही. भगिरथ भालके हे कित्येक दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. भगिरथ भालके यांच्याविषयी राष्ट्रवादी पक्षात व शेतकरी, सभासदांमध्ये तीव्र नाराजीचा सूर देखील उमटला आहे.
पोटनिवडणूक झाली तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मी या कारखान्याचा पालक आहे असं देखील म्हटलं होतं. पत्रकारांनी आता अजित पवारांना कारखान्याबद्दल विचारल्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि काही मुद्दे उपस्थित केले आहेत.
अजित पवारांनी विठ्ठल कारखान्याच्या व्यवस्थापनाबाबत काही मुद्दे उपस्थित करत कारखान्याला यापुढे आर्थिक मदत करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे. मागे कारखान्याला दिलेल्या पैशाचे काय झाले ? असा सवालही त्यांनी कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके व त्यांच्या संचालक मंडळाला विचारला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केलल्या प्रश्नांमुळे विठ्ठल परिवारात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
ज्या सहकारी संस्थांना त्यांच्या काही चुका नसताना मदत करणे गरजे होते, त्यांना मदत केली आहे. परंतु संस्थाचालकांनी व संचालक मंडळांनी ती संस्था चांगली चालली पाहिजे, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. टाळी एका हाताने वाजत नाही असं देखील अजित पवार म्हणाले आहेत.
मध्यंतरी कल्याणराव काळे व इतरांना सरकारने मदत केली. मागेदेखील विठ्ठल कारखान्याला पैसे दिले होते. त्याचे काय झाले, शेवटी जनतेचा पैसा आहे. भारत भालके होते, त्यावेळी ही पैसे दिले होते. पांडुरंगाच्या नावाचा हा कारखाना आहे. त्या नावाला साजेस असेच काम केले पाहिजे, अशी आमची भूमिका
असल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले.