मुंबई : वर्षभरापुर्वी राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण करणाऱ्या घडामोडी उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या. भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात भुकूंप आला होता. मात्र नंतर पुढे काय झाले हे, उभ्या महाराष्ट्राने पाहिले. शिवसेना आणि भाजपमधील यूती तुटल्याने फडणवीसांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते.
कालपासून राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनावधनाने फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केल्याने, पुन्हा जुन्या घटनांना उजाळा मिळाला आहे.
भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. या अधिवेशनाच्या सुरुवातीला शोकसभेमध्ये त्यांची आठवण सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांचा उल्लेख चक्क ‘मुख्यमंत्री’ असा केला. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी पुन्हा विरोधी पक्षनेते असा त्यांचा उल्लेख केला.
मात्र अजित पवारांकडून नकळत घडलेल्या या चुकीमुळे आता एकच राजकीय चर्चा सुरू झाली आहे.