राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्यामुळे आणि स्पष्ट वक्तव्यामुळॆ ते नेहमीच चर्चेत असतात. ते आपल्या कार्यकर्त्यांशी सुद्धा स्पष्ट वक्तव्य करतात. यातच आता सध्या अजित पवार यांच्या एक फोन कॉल व्हायरल झाला आहे. यामध्ये ते एका जिंतूर मधील कार्यकर्त्याशी बोलताना दिसत आहे.
परभणी येथील जिंतूर तालुक्यातील एका कार्यकर्त्याने पीक कर्जमाफी बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला होता. यामध्ये अजित पवार या कार्यकर्त्याला टोमणे मारताना दिसत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिंतुर आणि गंगाखेड या दोन्ही मतदारसंघांवर रासप आणि भाजपने अनुक्रमे विजय मिळवला.
जिंतूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांना स्वपक्षीयातील नाराजी भोवली़ शिवाय भाजप नेत्यांनी मेघना बोर्डीकर यांच्यासाठी ताकदीने प्रचार केला़ परतूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेघना यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते़ त्यांचा येथे भाजपला फायदा झाला़ त्यामुळे बोर्डीकर यांनी भांबळे यांचा ३ हजार ७१९ मतांनी पराभव केला़ गंगाखेड मतदारसंघात रासपचे रत्नाकर गुट्टे यांनी चमत्कार करीत तुरुंगात असताना शिवसेनेचे विशाल कदम यांचा १८ हजार १५८ मतांनी पराभव केला़ येथे राष्ट्रवादीचे विद्यमान आ़ मधुसूदन केंद्रे सहाव्या क्रमांकावर फेकले गेले़.
या निवडणुकीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी या जिंतूरच्या कार्यकर्त्याला टोला लगावला. जेलमध्ये बसलेल्यांना तुम्ही निवडून देता काम करणाऱ्याला तुम्ही निवडून देत नाहीत म्हणूनच तुम्ही मागे आहात. अशा रोखठोक भाषेत त्यांनी कार्यकर्त्याला टोलेबाजी केली.
तसेच यावेळी अजित पवार यांनी बारामतीमधील त्यांचे वर्चस्व सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला टोला लगावला. ते म्हणाले, “बारामतीत आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सलग ५० वर्ष निवडून दिले. रायबरेलीत एका निवडणुकीत इंदिरा गांधी देखील पडल्या होत्या. मात्र बारामतीत सलग दोन पिढ्या आमचं वर्चस्व अजून कायम आहे. देशात असा कुठे रेकॉर्ड नसेल” अशा शब्दात त्यांनी जिंतूर मधील त्या कायर्यकर्त्याला उदाहरण देत अप्रत्यक्षपणे देशातील काँग्रेस पक्षाला टोला लगावला.
रायबरेलीत का झाला होता इंदिरा गांधी यांचा पराभव?
२६ जून १९७५ साली देशात आणीबाणी लागू केली होती मात्र या आणीबाणीचे मूळ 1971 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे, जेव्हा इंदिरा गांधींनी रायबरेली मतदारसंघातून राजनारायण यांचा पराभव केला होता. परंतु राजनारायण यांनी हार मानली नाही उलट निवडणुकीत गडबड केल्याचा आरोप करत हायकोर्टात आव्हान दिले. 12 जून 1975 रोजी अलाहाबाद हायकोर्टाचे जस्टिस जगमोहनलाल सिन्हा यांनी इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करून त्यांना 6 वर्षे निवडणूक लढण्यावर प्रतिबंध लावला. कोर्टाच्या निकालानंतर इंदिरा गांधींवर विरोधकांनी राजीनाम्याचा दबाव टाकला. परंतु त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला.
जयप्रकाश नारायण यांनी इंदिरांविरुद्ध आघाडी उघडलेली होती. आणीबाणीच्या माध्यमातून इंदिरा गांधींनी तो विरोध शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु 19 महिन्यांनी 18 जानेवारी 1977 रोजी इंदिरांनी अचानकच मार्चमध्ये लोकसभा निवडणुका घेण्याची घोषणा केली. 16 मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत इंदिरा आणि संजय दोघेही पराभूत झाले.