मुंबई: महाविकास आघाडी सरकार मधील घटकपक्षांमधे मोफत लसीकरणावरून संघर्ष बघायला मिळत आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार मधील धुसमुस समोर येत आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणाच करून टाकली होती. पण, यात श्रेय घेण्यासाठी जी लढाई सुरू आहे, ती योग्य नाही. निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला पाहिजे, असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टोला लगावला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री नवाब मालिकांसह इतर कोणत्याही नेत्याने या मध्ये लुडबुड करू नये या साठी सर्वांचे कान तिखट शब्दात टोचले आहेत.
अजित पवार यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडेल, असे निर्णय केवळ मुख्यमंत्री घेतील, असे म्हणत मंत्री नवाब मलिक यांचे कान टोचले. कुणीही सरकारवर भार पडेल, असे वक्तव्य करू नये, असा इशारा दिला. या गोंधळावर भाजपतर्फे प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. १८ वर्षांपुढील वयोगटासाठी १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात असलेल्या शंकांचे राज्य सरकारने निरसन करावे, अशी मागणी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लसीकरणासाठी तरुणांमध्ये उत्साह आहे.
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली तर दुसरीकडे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट केले मात्र नंतर हे ट्विट डिलीट केल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. याच मुद्द्यांवरून भाजप प्रदेशचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सरकारला धारेवर धरले. उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नवाब मलिकांना घरचा अहेर दिला ते बरे केले. सरकारमध्ये एकूणच गोंधळाचे वातावरण आहे. काँग्रेस पक्षाची एक भूमिका तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी तर शिवसेनेची तिसरीच भूमिका असं ताळमेळ नसणार हे सरकार आहे असे देखील केशव उपाध्ये यावेळी म्हटले.